Mar 30, 2011

गल्ली क्रिकेटचे नियम !

गल्ली क्रिकेट मधे अनेक पोटविभाग असतात. ते ‘ट्वेंटी ट्वेंटी’ किंवा ‘वन डे’ असे नसतात कारण सहसा गल्ली क्रिकेटचा सामना एका दिवसात कधीच संपत नाही. अंधार झाल्यामुळे किंवा आत्ता फलंदाजी करणारा भिडू सांगितलेले महत्वाचे काम विसरला आहे, हे त्याच्या मातोश्रींच्या लक्षात आल्याने सामना संपतो. त्यामुळे, दर दिवशीचा खेळ ‘कालचा सामना पुढे चालू करायचा’ का ‘नवीन डाव सुरु करायचा’ ह्या चर्चेपासूनच चालू होतो.

गल्ली क्रिकेटचे पोटविभाग मुख्यत: स्थळानुसार बदलतात. गल्ली जिथे संपते तिथे म्हणजे ‘डेड एंड’ वर खेळली जाणारी लाइव्हली मॅच; सिमेंट किंवा फरशांच्या जमीनीवर सोसायटीत खेळला जाणारा दररोजचा सामना; शाळेत मधल्या सुट्टीत रंगणारे अतिझटपट क्रिकेटचे सामने असे त्याचे स्वरुप बदलत असते.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट आता बरेच गुंतागुंतीचे व नवनवीन नियम असलेले झाले आहे. पण पारंपारिक गल्ली क्रिकेटचे नियम व क्षणाक्षणाला पलटणारी बाजी पाहिली तर ते नक्कीच आंतरराष्टीय क्रिकेटला
यष्टीचीत करणारे असेल.

गल्ली क्रिकेट खेळण्यासाठी त्याचे एकंदर वातावरण व आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तोंडात मारतील असे नियम व पोटनियम समजून घेणे जरुरीचे आहे:

  1. केवळ क्रिकेटच्या सामानाची कमतरता ह्यामुळे सामना सुरु व्ह्यायला कधीही उशीर होत नाही. शाळेत दफ्तरांची रास करून त्याचे स्टंप होतात. परीक्षेनंतर अचानक सामना ठरला (बहुदा एका ‘तुकडी’ ने दुसरीला चॅलेंज फेकले म्हणून) तरी काही क्षणातच रुमालाचा चेंडू व परीक्षेसाठी आणलेल्या ‘पॅड’ ची बॅट होते.
  2. गल्ली क्रिकेटमधे ज्याची बॅट सर्वात चांगली त्याची पहिली बॅटींग असते.
  3. सोसायटीत सर्वात वरच्या मजल्यावर राहणा-या डॉ. गोगट्यांच्या गाडीला फटकावलेला चेंडू आदळला तर फलंदाज बाद होतो !
  4. चेंडू ‘मृत’ होण्याची वाट न बघता, धाव काढल्या काढल्याच नुसती बॅट टेकवून इकडचा फलंदाज तिकडच्याशी हितगूज करायला कधीही जाऊ शकतो.
  5. जिथे सर्वात जास्त ‘शॉट’ मारला जाण्याची शक्यता असते नेमक्या त्या दिशेला व त्या उंचीवर सोसायटीतल्या सर्वात रागीट आणि ‘सरकलेल्या’ बि-हाडकरूच्या खिडकीची काच असते. (दर वेळी काचेला बॉल लागल्यावर क्रिडांगणात हमखास पांगापांग होते)
  6. पत्र्याचा डबा, जमीनीत खोचलेल्या दोन लहान फांद्या, किंवा खडू अथवा विटकरीने भिंतीवर काढलेला आयत हे ‘स्टंप’ होऊ शकतात.
  7. ‘थर्ड अंपायर’ हे बहुदा गॅलरीत मळकट बनियन मधे बसलेले सुखापुरे आजोबा असतात.
  8. ‘स्लेजिंग’ हा नियम असतो व ‘जेंटलमन्स गेम’ हा अपवाद असतो.
  9. ‘हूक शॉट’ वर बंदी असते कारण क्रिडांगणाच्या आकारामुळे अशा शॉट मधे, बॅट ही जवळच्या फिल्डरला लागू शकते.
  10. ‘बेल्स’ नवीन ‘किट’ असेल तर फार तर आठवडाभर वापरल्या जातात. नंतर त्यातली एक हरवते किंवा दर वेळी लावायचा कंटाळा येतो त्यामुळे फारच अभावाने वापरल्या जातात.
  11. उत्कृष्ट मारलेला शॉट जर पलिकडच्या झोपडपट्टीत किंवा गटारात किंवा पलिकडच्या वाड्यातल्या विहीरीत वगैरे गेला तर फलंदाज बाद होतो.
  12. भाजी घेऊन संथपणे येणा-या काकू काही काळ सामना स्थगित करू शकतात.
  13. ‘टिम्स’ पाडताना एक अष्टपैलू भिडू असा असतो जो दोन्ही बाजूच्या कर्णधारांचा पहिला चॉईस असतो त्यामुळे अपेक्षित निवड झाल्यावर तो विजयी मुद्रेने आपल्या नवीन कर्णधाराकडे जातो.
  14. क्रिडांगणाची एकंदर भौगोलिक मर्यादा लक्षात घेता, षटक संपल्यावर इकडचा फलंदाज तिकडे जातो आणि तिकडचा इकडे. गोलंदाजी नेहमी एका बाजूनेच करायची असते.
  15. ‘नो बॉल’ नसतोच कारण ब-याच वेळा गोलंदाजाच्या बाजूला आखलेल्या रेषा वगैरे नसून फक्त एक दगड ठेवला जातो. (क्षेत्ररक्षकाने फेकलेला चेंडू, गोलंदाज ह्याच दगडावर पाय ठेवून झेलतो तेव्हा ‘सर्कीट’ पूर्ण झाल्यामुळे अजून न पोचलेला फलंदाज धावचीत होतो असा नियम आहे)
  16. त्या दिवशी सर्दी खोकला वगैरेने माफक आजारी असलेल्या मुलाला अंपायरगिरी करायला खाली उतरावे लागते. इतर वेळी, नियम माहित असणे ह्यापेक्षा न रुचलेल्या निर्णयामुळे अंगावर धावून येणा-या आक्रमक खेळाडूंना शांतपणे तोंड देण्याची क्षमता असणा-या भिडूला अंपायर केले जाते.
  17. उत्तुंग षटकारानंतर चेंडू दाट झाडीत किंवा छपरावर वगैरे गायब झाला तर फलंदाजाच्या वाट्याला कौतुकाऐवजी नवीन चेंडूचा खर्च येऊ शकतो. शिवाय, ‘साला वानखेडेवर खेळल्यासारख्या स्टाईली करतो. आम्ही पण हाणू शकतो असे शॉट्स’ असे शेरे ऐकावे लागतात.
  18. दुस-या मजल्यावरून एखादा मोहक चेहरा जर सामना बघत असेल तर खेळाडूंच्या कौशल्यात अचानक वाढ होऊन सामना अगदी चुरशीचा होतो. (मॅच नंतर काही ‘फिक्सिंग’ होईल का ह्याची स्वप्ने प्रत्येक भिडू खेळताना पाहत असतो.)
  19. ‘कस्ला मारला ना मी’ अशा नांदी होऊन मग दोन तीन वेळा त्याच त्याच ऍंगलने फलंदाजाकडून एखाद्या फटक्याचा ‘ऍक्शन रिप्ले’ पहायला लागतो.
  20. जुन्या चेंडूचा पिचून नैसर्गिक मृत्यू झाला तरच वर्गणी काढून नवीन चेंडू घेतला जातो नाहीतर ज्याच्या चुकीमुळे चेंडू गेला त्याने तो ‘भरून’ द्यायचा असतो.
  21. एकच बॅट चांगली व त्यामुळे सर्व फलंदाजांची लाडकी असते. त्यामुळे दर वेळी एक धाव घेतली की बॅटींची अदलाबदल करण्याचा कार्यक्रम होतो.


- राफा


 ह्या लेखाची PDF फाईल उतरवून घेण्यासाठी इथे क्लिक करा


Mar 29, 2011

त्या दिव्याखाली..

माझ्या घरासमोरच..

त्या पांढुरक्या, क्षीण दिव्याखाली
संध्याकाळी जमतात
रोज तीच ती..

जवळजवळ विझत आलेली माणसं.

सुरकुतलेल्या हातांची,
भेगाळ चेह-यांची,
कृश, थरथरणा-या शरीरांची

अजूनही जिवंत असणारी..  ती माणसं.

सुकल्या, पराभूत तोंडांनी
आजूबाजूला वाढणा-या अंधाराकडे बघणारी,

कुठेतरी शून्यात नजर लावून
आयुष्याच्या चुकलेल्या गणिताची
पायरी न पायरी मूकपणे
पुन्हा पुन्हा तपासणारी,

रोज एकत्र जमून, एक शब्दही न बोलता
तशीच परत जाणारी..

ती माणसं..

त्यांचे गेले ते बहुतेक दिवस
कठीण. शुष्क.
खड्यांसारखे..

वेचून वेचून फेकून द्यावेसे..
पण तेच आठवून आठवून सारवत बसतात

ती माणसं..
रोज संध्याकाळी..
त्याच पांढुरक्या क्षीण दिव्याखाली.

अचानकच,
मधेच कुणाला तरी आठवतो
कधीतरी आलेला, एखादा.. अगदी एखादाच,
शुभ्र तांदूळाच्या दाण्यासारखा एक दिवस.

त्या दिव्याखालच्या अंधाराला
मग दोन चार शब्द फुटतात
काही क्षण लकाकतात बोलणाराचे डोळे
काही क्षण तरारतात ऐकणा-यांची मने

आपण नियतीला आयुष्यात एकदाच
पण कसे अगदी साफ हरवले..
ती अस्पष्ट कहाणी ऐकताना
काहीसा सुखावून
तो दिवाही फरफरल्यासारखा वाटतो

काहीच क्षण..
मग पुन्हा अस्पष्ट प्रकाशात,
अंधार ठळक जाणवू लागतो..

..

तो डोक्यावरचा पांढुरका क्षीण दिवा,
आता लवकरच जाईल..

पण वाटतं,

तरीही जमतीलच रोजच्या रोज
ती माणसं..
तो नि:शब्द काळोखच बहुतेक
त्यांना उबदार वाटतो आताशा


विझत आलेला दिवा शेवटी शेवटी
अंधाराचा मित्र होत जातो..


- राफा